कधी कधी वाटतं, कालगणना करण्यासाठी 'बिफोरख्राईस्ट' आणि 'आफ्टर ख्राईस्ट' अशी जी ढोबळ विभागणी केली जाते ती बदलावी आणि 'बिफोर इंटरनेट' आणि 'आफ्टर इंटरनेट' अशी करावी. कारण डेटा स्वस्त झाल्यावर आणि सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन आल्यावर जग बदललंच. म्हणजे नेमकं काय झालं? हेच आपल्याला पाहायचं आहे. आता तिशी आणि चाळीशीमध्ये असलेल्या पिढीने ही दोन्ही टोकांची जग अनुभवली आहेत. किंबहुना बदलांच्या अतिवेगाने या वयोगटातल्या पिढ्या भेलकांडल्या आहेत. ऐंशीच्या दशकात जन्म झालेल्या आणि नव्वदच्या दशकात तरुण झालेल्या पिढीच्या उसळत्या हार्मोन्सचं त्या पिढीनं काय केलं याचं बैजवार डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. इतिहासाचं हे पान गळून पडलं तर तसं फार नुकसान होणार नाही पण एका पिढीने आपल्या वाफाळत्या दिवसांचं काय केलं याची नोंदच कुठं राहणार नाही. त्यासाठीच हा लेख!