फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला आपल्या स्वरांनी व्यापून टाकणा-या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजली आणि नकळत टि.व्ही लावला गेला. संपूर्ण भारतावर शोककळा पसरली होती. जग जणू काही काळासाठी स्तब्ध झाल्यासारखे वाटत होते. लतादिदींच्या स्वरातील गाणी टि.व्ही. वर एका मागोमाग एक लावली जात होती. मधूनच त्यांच्या सुहृदांच्या आठवणी जागवल्या जात होत्या. संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला तो स्वर असा सातत्याने ऐकताना एकच भाव मनात येत होता तो म्हणजे आर्तता..! लतादिदींच्या जाण्याने निर्माण झालेल्या दुःखासोबतच त्यांच्या स्वरांनी मनात जागृत झालेल्या करूणेचा अनुभव विलक्षण होता आणि ही करूणा सर्वांच्या मनात सातत्याने राहो हीच प्रार्थना पुन्हा पुन्हा मनात येत होती. हा एक विलक्षण अनुभव होता!